भवानीनगर -इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली भवानीनगर येथील व्यापारपेठ गेल्या सहा महिन्यांत केवळ दीड महिनाच सुरु राहिली आहे. गेले साडेचार महिने व्यापारपेठेला आर्थिक झळ बसली आहे. सध्या इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू केल्याने गावगाड्यातील अर्थकारणावर दूरगामी परिणाम झाले आहेत. भवानीनगर परिसरात हा जनता कर्फ्यू 20 तारखेपर्यंत लागू करण्यात आला आहे.
केवळ दीड महिना व्यापारपेठ सुरू असूनदेखील त्यामध्ये सकाळी नऊ ते पाच या वेळेत व्यापारपेठमध्ये नागरिकांना खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी पूर्णपणे आर्थिक अडचणीत आले आहेत. पुढील काळात किती व्यापारी टिकून राहतील आणि किती व्यवसाय बंद पडतील अशी अवस्था व्यापाऱ्यांची झाली आहे. भवानीनगर परिसरातील 20 ते 22 गावांतील नागरिक खरेदीसाठी याच व्यापारपेठेत येतात.
मात्र, महामारीमुळे ग्राहक व्यापारपेठेत फिरकत नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. बॅंकांचे कर्ज, लाखो रुपयांची गुंतवणूक कामगारांचे वेतन याचा ताळमेळ कसा घालायचा हा प्रश्न व्यापाऱ्यांना सतावत आहे.
भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरातील संणसर, बेलवाडी, सपकळवाडी, हिंगणेवाडी, तावशी, उद्धट, लाकडी, निम्बोडी तसेच बारामती तालुक्यातील काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, सोनगाव, खताळपट्टा, ढेकळवाडी, कन्हेरी परिसरातील नागरिक व्यापारपेठेत तुरळक प्रमाणात खरेदीसाठी येत आहेत.
अर्थकारणाचा गाडा करोनामुळे रुतला
एकीकडे महामारी रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे अर्थकारणाचा गाडा रुतला आहे. त्यामुळे भवानीनगर परिसरात सन्नाटा पसरलेला आहे. यामुळे व्यापारी व व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील काळात किती व्यापारी टिकून राहतील आणि किती व्यवसाय बंद पडतील याबाबत व्यवसायिक हतबल झाले आहेत.