पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यात येत्या तीन ते चार दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर कोकण गोव्यातील रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 24 तासात खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
समुद्र सपाटीवरील किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत आहे. त्यामुळे दि. १८ जुलै रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता असल्याने आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पुढील 48 तासात घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल. त्यामुळे या परिसरातही हवामानशास्त्र विभागाने आॅरेंज अलर्ट दिला आहे.
दि. 18 ते 21 जुलै दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. तर विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामानशास्त्र विभागाने या परिसरात यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे कोयना परिसरात 20, ताम्हिणी घाट माथ्यावर 15, डुंगरवाडी येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.