नवी दिल्ली – प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर आता कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे वारे वाहत आहे. नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत दिल्ली दरबारी दाखल झाले असून मंत्रिपद कोणाला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. तसेच नितीन राऊत यांच्याकडेही नवीन जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले हे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आहे. पटोले यांनी आपल्याला मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे कॉंग्रेस हायकमांडकडून राज्यात खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा दिल्लीत पोहोचले आहे. त्यांनी सुद्धा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर नाना पटोले यांनी राज्यात कॉंग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 2024 पर्यंत आपण हे लक्ष्य गाठणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी सोनियाजी आणि राहुलजी यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात पक्ष पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2024 पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करु असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते हे नाना पटोले यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. जर ऊर्जा खाते नाना पटोले यांना देण्यात आले तर नितीन राऊत यांना नवीन जबाबदारी दिली जाण्याची चिन्ह आहे. मध्यंतरीच्या काळात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रिपद हे कॉंग्रेसला द्यावे असा सूर लावला होता. परंतु, कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याला नकार दिला होता. मात्र, राहुल गांधी यांनी सुद्धा राज्यात सत्तेत बरोबरीचे स्थान मिळावे अशी अगोदरपासूनच भूमिका मांडली आहे. आता सुद्धा ते समान वाटपासाठी बोलल्याचे कळत आहे. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसच्या निर्णयामुळे मोठे बदल होण्याची शक्यता आहे.