तृप्ती देसाईंच्या आरोपावरुन अकोलेकर संतप्त
अकोले – निवृत्ती महाराजांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वातावरण शांत होण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे आहेत.
यासाठी एकत्र येण्याची व याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व अकोले नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष के. डी. धुमाळ व त्यांचे समर्थक उद्या अकोले येथे बैठक घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवृत्ती महाराजांना तालुक्यातून पाठिंबा नाही. त्यामुळे अकोले बंद झाला नाही, अशी गरळ तृप्ती देसाई यांनी ओकण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर काल नगर येथे बोलताना “निवृत्ती महाराजांच्या तोंडाला अकोले येथे येऊन काळे फासू’ असेही वक्तव्य केले. आता डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे. एकदाचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे धुमाळ व त्यांचे समर्थकांनी आपले विचार प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना मांडले.
गेले दहा ते बारा दिवसांपासून अकोले तालुक्याचे भूषण असलेले हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनातील वक्तव्याचा विपर्यास काढून काही तथाकथित ढोंगी माणसांनी त्यांच्या विषयी अपप्रचार चालवलेला आहे,असे निदर्शनास आणून देत महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तथाकथित सेविका ? तृप्ती देसाई, तथाकथित संत साहित्यातील प्रचारक, व काही निवृत्ती महाराजांचे कट्टर विरोधक यांनी निवृत्ती महाराजांविरुद्ध गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.
आपण देखील सर्व गोष्टी संयमाने घेत कायदेशीर बाबींचा विचार करून या सर्व गोष्टींना समोर जावयाचे ठरले, अशी माहितीही दिली.
कालच निवृत्ती महाराजांनी आपल्या पत्राद्वारे सकल स्त्रिया, माता, भगिनी यांचा आपल्या वक्तव्याने काही अवमान होत असेल तर दिलगिरी देखील व्यक्त केली.
या सर्व गोष्टींचा वेगळा अर्थ तृप्ती देसाई यांनी घेतला दिसतो, असे ते म्हणाले. अकोले तालुक्यातील सर्व वारकरी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, तसेच निवृत्ती महाराजांवर प्रेम करणाऱ्यांनी अकोले बंदची हाक दिली होती. मात्र निवृत्ती महाराजांच्या सांगण्यावरून बंद मागे घेतला. याचाही विपर्यास तृप्ती देसाई यांनी केलेला दिसतो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
अकोलेकरांनी आता ताठ मानेने या सर्व गोष्टींचा सामना करणे आवश्यक आहे. सर्व अकोले तालुक्याने निवृत्ती महाराजांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे झाले आहे. आता तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध, तसेच इतर खोटा बुरखा पांघरूणाऱ्या संघटनांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तालुक्याने संघटित झाले पाहिजे. त्याकरीता विचारविनिमय होणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन तालुक्यातील जनतेला केले आहे.