सातारा (संतोष पवार) – जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम जोरात सुरु असली तरी लसीच्या तुटवड्यामुळे अद्यापही जिल्ह्यातील तीन लाख नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. लसीचा तुटवडा असल्याने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने दि. 1 मे पासून सुरु होणारी 18 वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहीम लांबण्याची चिन्हे आहेत. तुटवड्यामुळे लसीकरण संथगतीने सुरु असल्याचा हा परिणाम आहे.
जिल्ह्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने भीती होती. करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर ही भीती काही प्रमाणात कमी होऊ लागली आहे. प्रशासनाने प्रारंभी फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी आदींच्या लसीकरणास प्राधान्य दिले. त्यानंतर 45 वर्षांवरील कोमॉब्रिड नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
दि. 1 मार्चपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. या वयोगटातील जिल्ह्यात 8 लाख 30 हजार नागरिक आहेत. दि. 27 एप्रिल अखेर जिल्ह्यात पाच लाख 30 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्याशिवाय 45 वर्षांवरील नागरिकांपैकी सुमारे साडेतीन लाख लोकांनी पहिला डोस अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये उर्वरित तीन लाख नागरिकांचे लसीकरण होणे शक्य नाही.
जिल्ह्यात प्रारंभी 350 केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरु होती. मात्र, तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण संथगतीने सुरु असल्याने दि. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची सरकारची घोषणा सध्या तरी अधांतरीच दिसत आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा पाहता तीन दिवसात तीन लाख लसीकरण उरकणे शक्य नाही. दिवसाला सरासरी 30 हजार लसीकरण झाले तरी ही मोहीम दि. 10 मेपर्यंत तरी सुरु ठेवावी लागणार आहे. मात्र, सध्या ज्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे त्या आकडेवारीनुसार ही मोहीम दि. 20 मेपर्यंत सुरु राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लसीचा असाच तुटवडा राहिला तर दि. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करुन देण्यात सध्या तरी अडचणी दिसून येत आहेत. जिल्ह्यात अठरा वर्षांवरील सुमारे 19 लाख नागरिक असून त्यांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी लसीच्या तुटवड्यामुळे दि. 1 मे पासून लसीकरण सुरु कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांनाच लस देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. सद्य परिस्थितीत लसीकरण प्रक्रिया थंडावली असल्याने आगामी काळात त्यात आमूलाग्र बदणे होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणात व्यत्यय येत आहे. परिणामी लसीकरणाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात अडचणी येत आहेत. अद्यापही 45 वर्षांवरील तीन लाख नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांना दि. 1 मेपासून लस उपलब्ध करण्यात अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीचा साठा वाढल्यास काही अंशी गतीने प्रक्रिया होण्यास मदत होणार आहे.
– डॉ. अनिरुध्द आठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा)