पालखीतून देवदेवता, साधुसंत, सत्पुरुष आणि सद्गुरू तसेच राजे महाराजे ह्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्याची आपल्या संस्कृतीत फार जुनी परंपरा आहे. तसे दाखले आपल्याला आपल्या धार्मिक ग्रंथातून, संत चरित्रांतून वाचायला मिळतात.
श्रीगुरू चरित्र ह्या ग्रंथात यवनराजाने दत्तगुरूंना वाजतगाजत पालखीतून आपल्या नगरीत मिरवीत नेल्याची नोंद आपल्याला वाचायला मिळते. तसेच श्रीस्वामी समर्थ, साईबाबा ह्यांच्याही भाविक भक्तांनी त्यांना वाजतगाजत पालखीतून मिरवीत नेल्याचीही वर्णने त्यांच्या चरित्र ग्रंथातून, पुस्तकांतून आलेली आहेत.
पालखीची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली असून ती आजच्या युगातही अखंडित अन् अबाधितपणे चालू आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुराकडे जाणाऱ्या पालख्या तर आपण दरवर्षीच पाहतो. त्या संतांच्या पालख्या आणि त्या सोबत जाणारे असंख्य वारकरी हा तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मोठा आणि चालता बोलता दाखला आहे.
पालखी म्हणजे नेमके काय? तर पूज्य, वंदनीय अशा व्यक्ती, मूर्ती किंवा सिद्ध सत्पुरुषाच्या पादुका ह्यांना खरं तर खाद्यावरून मिरवीत नेण्याचे एक वाहन. ह्याचा मधला भाग हा काहीसा आयताकृती असतो. चारी बाजूंनी साधारण अर्धा ते पाऊण फुटीचे कठडे, वरील आकार हा गोलाकार, त्यास मोती, फुले, झालर ह्यांची सजावट. पालखी खाद्यांवर घेण्यासाठी मागे पुढे गोलाकार दांडे. किमान दोन ते तीन लोक पुढे व मागे मिळून उचलू शकतील अशी सोय. या अशा पालखीचे हे वाहक, म्हणजे जे लोक ती खांद्यावर घेतात त्यांना “भोईर’ असे म्हणतात.
आज अगदी एकविसाव्या शतकातही कोल्हापूर, नरसोबाचीवाडी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट, शेगाव, शिर्डी अशा देवस्थानी मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा अशा खास दिवशी असा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. या अशा पालख्यांच्या सोबत ताशा-वाजंत्रीवाले, भालदार, चोपदार, चवरी ढाळणारे, पुजारी, पुढे टाळकरी, वीणेकरी असतात. पालखीच्या वाटेवर जागोजागी कापूर लावणे, औक्षण करणे, भजन, पद गायन अशी सेवाही सादर केली जाते. पालखीचा मार्ग सडा रांगोळ्या घालून किंवा फुलांच्या पायघड्या घालून सुशोभित केला जातो.
वाजतगाजत येणाऱ्या पालखीतील आपल्या उपास्य देवतेचे दर्शन घडणे, पादुकांचा स्पर्श लाभणे, प्रसाद पुष्पांचा लाभ होणे, या सारख्या गोष्टी या सश्रद्ध भाविकाच्या मनास मिळणारी एक सुखद अनुभूती असते.
-अरुण गोखले