आज ज्यावेळी सारं जग हे एका हिंसात्मक, अराजकता, दहशतवाद आणि अशांत अशा खदखदणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडावर येऊन ठेपले आहे. त्यावेळी शांती आणि अहिंसेचा पाठ शिकवणारी आपली भारतीय संस्कृती हीच सर्वांना आपल्याकडे आकृष्ट करीत आहे, ती अहिंसेच्या पुरस्कारामुळेच.
अहिंसा हा शब्द आपल्याला लगेच आठवण करून देतो, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर ह्यांची. महात्मा गांधींचे अहिंसातत्त्व आणि त्याच्या सामर्थ्यावर मिळविलेल्या स्वातंत्र्याची इतिहासाच्या पानात नोंद आहेच.
हिंसा करून एखाद्या निरपराध जीवाचा जीव घेणे ह्यापेक्षा अहिंसेचा धर्म पाळून एखाद्याचा जीव वाचविणे हे किती महत्त्वाचे आणि उच्च कोटीचे आहे, ह्या संदर्भातली सिद्धार्थ आणि त्याच्या भावामधली हंसाच्या शिकारीची गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.
ती गोष्ट आपल्याला जगायला आणि इतरांना जगवायला शिकविते. स्वत: शांतीने आनंदात जगा आणि इतरांनाही जगू द्या. नव्हे तर त्यांना जगवा, हा संतबोधही या संदर्भात लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे.
“अहिंसा परमो धर्म:’ हे गीतावचन जसे आपल्या परिचयाचे आहे. तसेच गौतम बुद्धांचा बौद्धधर्म सत्य, अहिंसा, प्रेम आणि दया ह्या तत्त्वांवरच आधारलेला आहे, हेही आपल्या लक्षात आल्यावाचूून राहत नाही. महावीरांचा जैनधर्म तर अगदी किड्यामुंगीचीही हिंसा करू नका हेच शिकवितो.
हिंसा म्हणजे काय? तर हत्या, दुसऱ्याला इजा करणे, त्याला मारणे, दुखावणे, जखमी करणे किंवा अगदी मारून टाकणे म्हणजे हिंसा. अशी हिंसा केवळ शस्त्रानेच घडत असते असे नाही तर आपण अनेकदा ती शस्त्रापेक्षाही शब्दशस्त्रानेच जास्त करीत असतो. आपल्या शब्दांनी आपण माणसांना दुखावतो, त्यांना दूर लोटतो, त्यांचा अवमान, उपमर्द, निंदा, नाचक्की करून त्यांना जिवंतपणी मरणयातना देतो, ही सुद्धा हिंसाच.
आपला अहिंसा धर्म आपल्याला शस्त्र, शब्द, कृती या कशानेही हिंसा करू नका हेच शिकवितो. जर आपल्याला जोडण्याची किमया करता येत नसेल तर मग आपल्याला तोडण्याचा तरी अधिकार का आणि कोणी दिला? हेच अहिंसेचे पुरस्कर्ते आपल्याला विचारत असतात, आणि आपल्यातच वैचारिक परिवर्तन घडवून आपल्याला अहिंसेच्या मार्गावर चालायला प्रवृत्त करतात. अहिंसेचा धर्म पाळणे आणि शांतीचे साम्राज्य प्रस्थापित करणे हे सध्याच्या काळात फार गरजेचे झालेले आहे.
– अरुण गोखले