नारायणगाव (वार्ताहर) – विनाकारण गावात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना काठीचा पोलिसांनी चोप सुरू केल्याने नारायणगाव परिसरात संचारबंदीचा खरा नियम लागू झाल्याचे चित्र हा दुपारपासून दिसून येत होते.
नारायणगाव परिसरात काल (रविवारी) जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा आदेश जारी केला. यानंतरही नारायणगाव शहरात बऱ्याच ठिकाणी चारचाकी, दुचाकींचा वावर जास्त होताना दिसत होता; परंतु दुपारी दोन वाजल्यानंतर वाहने व नागरिकांची रस्त्यावर गर्दी वाढण्याची शक्यता होत असल्याने नारायणगाव पोलिसांनी विनाकारण फिरणारी वाहने अडवून काही वाहनचालकांना तंबी दिली व काहींना लाठीचा चोप दिल्याने वाहनचालकांमध्ये धांदल उडाली होती. पोलिसांचा चोप सुरू असल्याचे पाहून पाठीमागून व समोरच्या बाजूने येणारी वाहने माघारी फिरून जात होती. काही नागरिक दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन फिरत असताना दिसत होते.
यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे म्हणाले, नागरिकांना विनाकारण एकटे अथवा जास्त जणांनी रस्त्यावर फिरू नये, अत्यावश्यक दुकाने व भाजी बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन केले.
भाजीबाजार सुटसुटीत जागेत
नारायणगावातील भाजी बाजारात गर्दी होत असल्याने ती जागा बदलून मुक्ताई देवी ट्रस्टच्या शिव मुक्ताई गार्डन समोरील मोकळ्या पार्किंगच्या जागेत भाजी विक्रेत्यांना जागा ठरवून देत, दोन भाजी विक्रेत्यांमध्ये तीन मीटर अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था आज (सोमवारी) सरपंच योगेश पाटे यांनी करून दिली. त्यामुळे भाजीबाजारात गर्दी कमी व सुटसुटीतपणा दिसून येत होता. गर्दी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी माइकवरून वारंवार सूचना देऊन गर्दी होऊ देत नव्हते.