ओतूर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असलेल्या ओतूर (ता. जुन्नर) येथील आवारात दर रविवारी व गुरुवारी शेतकरी कांदा, बटाटा, डांगर, भोपळा आदी फळभाज्या व दररोज सायंकाळी भाजीपाला मार्केट भरते. परंतु (दि. 24) पासून करोनोची भीती, जिल्हाबंदी यामुळे पुणे जिल्ह्याबाहेरील व्यापारी कांदा, बटाटा, तरकारी भाजीपाला खरेदीसाठी येत नाहीत. येथील उपबाजारात शेतकरी शेतीमाल आणत नाहीत. त्यामुळे उपबाजार आवारात शुकशुकाट जाणवत आहे.
ओतूर येथे रविवारी व गुरुवारी मुंबई, वाशी, कल्याण, ठाणे येथील कांदा व बटाटा खरेदी करण्यासाठी अनेक मोठे व्यापारी येतात. व्यापारी येत नसल्याने शेतकरी दररोजचा भाजीपाला आणत नाहीत.
संचारबंदी असल्यामुळे माथाडी कामगार, हमाल यांनीही ओतूर उपबाजार आवाराकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे ओतूर उपबाजार आवारात शुकशुकाट जाणवत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट सुरू ठेवले आहे. परंतु उपबाजार आवारात शेतीमाल नसल्याने मार्केट बंद झाले आहे, असे एका आडतदारांनी सांगितले.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांच्या सूचनेनुसार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओतूर उपबाजार आवारात सर्व सफाई करून जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे.
तसेच उपबाजार आवारात येणाऱ्या सर्व घटकांसाठी हॅंडवॉश, साबण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.बाजारात स्पीकरवरून व्यापारी शेतकरी यांना करोनोसंदर्भात प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचनांचे फ्लेक्स लावले असल्याचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.