कापूरहोळ (वार्ताहर) – करोना व्हायरसच्या धास्तीने ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम दिसू लागला आहे. कापूरहोळ, नसरापूर, किकवी, सारोळा भागातील बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. बॅंका, पतसंस्था, ग्रामीण भागातील सोसायट्यांमध्ये शुकशुकाट दिसत आहे, तर नसरपूचे बनेश्वर उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
पुणे शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या ग्रामीण भागात करोनाच्या भीतीचा प्रभाव दिसू लागला आहे. पुणे शहरात राहणारे नागरिक आपल्या मूळ खेडेगावात परतताना दिसत आहेत. प्रशानाने खबरदारीचा उपाय म्हणून किकवी, भोर येथील आठवडे बाजार पुढील काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे.
तालुक्यातील आठवडे बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते याकरता आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तहसीलदार व जिल्हा आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागांमध्ये साजऱ्या होणाऱ्या यात्राही रद्द करण्यात आले आहेत. तालुक्याचे आरोग्य पथक करोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले असून, स्वच्छतेबाबत जनजागृती नागरिकांपर्यंत मोबाइलद्वारे, तसेच बाजाराच्या ठिकाणी पत्रके वाटून केली जात आहे.
ग्रामपंचायत नसरापूर आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहे, तर बनेश्वर येथील उद्यान पर्यटकांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– गणेश हिवरेकर, सरपंच, नसरापूर
भोर तालुक्यातील सर्व औषधांच्या दुकानांमधून हॅण्ड सॅनिटायझर व मास्क योग्य दरात उपलब्ध असून त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून संघटनेच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे.
– राहुल देशपांडे, सेक्रेटरी, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ऑर्गनायझेशन