संसर्गाच्या धास्तीने मंदिरेही बंद
चीनपासून सुरु झालेल्या करोना या विषाणूच्या संसर्गाने जगभरातील देशांना वेढा दिला असून करोनाचे लोण भारतातही पसरले आहे. विशेष म्हणजे देशात करोनाचे सर्वाधिक 49 रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यापार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना सुरु केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याबरोबरच शासकीय कार्यालयांमध्येही अतितातडीच्या कामाशिवाय न येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गर्दी होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे लग्न समारंभासह यात्रा रद्द करण्यात आल्या असून गुरुवारपासून जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय संबंधितांनी घेतल्याने जिल्ह्यात सध्या तरी “देऊळ बंद’ करण्यात आले आहेत.
सुनीता शिंदे
कराड – श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित “देऊळबंद’ हा मराठी चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये एका सोसायटीमधील श्री स्वामी समर्थ महाराजांचे देऊळ बंद करण्यात आल्याने भक्तांची झालेली विचलित अवस्था चित्रित करण्यात आली आहे. सध्या अशीच काहीशी परिस्थिती देशभरात निर्माण झाली आहे. करोना या संसर्गजन्य आजारामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामध्ये मंदिरांचाही समावेश आहे. सर्व मंदिरे कुलूपबंद असल्याने देवाचे दर्शन भक्तांना होत नसून मोठी द्विधा मन:स्थिती झाल्याचे दिसत आहे.
एकविसाव्या शतकात आपण वेगाने झेप घेत असलोतरी आजही अनेकांचा देवावरील विश्वास कमी झालेला नाही. हे मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या यात्रांवरून स्पष्ट होते. देव आणि भक्त यांच्यातील नाते काही वेगळेच असते. अनेकवेळा देवालाही भक्तांसाठी धावून यावे लागते. पुरातन काळातील अनेक गोष्टींमधून आपण ते ऐकलेही आहे. काहींचा तर देवदर्शन हा नित्यनियम झालेला असतो. सकाळचे देवदर्शन घेतल्याशिवाय पाणीही न पिण्याचा अनेकांचा नित्यनियम असतो. कोणतेही संकट येऊदे त्यात कधीच खंड पडलेला नाही अशा प्रतिक्रियाही अनेक नागरिक देतात.
समाजात आजपर्यंत अनेक संकटे आली आणि गेली. कधी ती मानवनिर्मित होती तर कधी ती निसर्गनिर्मित होती. परंतु, कोणत्याही संकटांमुळे मंदिरे बंद झाल्याचे ऐकिवात नाही. सध्या करोना या संसर्गजन्य आजारामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामध्ये मंदिरे, उद्याने, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, जिम, स्विमिंग पूल यांचा समावेश आहे. मात्र, सर्वात जास्त गर्दी असते ती मंदिरांमध्ये, फेब्रुवारी ते जून या कालावधीत अनेक गावच्या यात्रा व जत्राही असतात. त्यानिमित्ताने परगावी असणारे चाकरमानी आपल्या गावी देशदर्शनासाठी येतात. पण यात्रांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमनी गावी येऊ शकत नाहीत. तर जे गावी आहेत त्यांनाही मंदिरप्रवेश बंद असल्याने देवदर्शन दुर्लभ झाले आहे.
सातारा जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये पालीचा खंडोबा, येराडचा येडोबा, म्हसवडचा सिद्धनाथ, शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर, तळबीड व चाफळचे श्रीराम मंदिर, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराजांचे मंदिर, औंधची यमाई, फलटणचे श्रीराम मंदिर, बनपुरीचे नाईकबा मंदिर, वाईची मांढरदेवी यासह अनेक मंदिरामध्ये दररोज नागरिकांची दर्शनासाठी गर्दी असते.
मंदिरांमध्ये आरती, अभिषेक असे नित्यनियमाने होणारे विधीही बंद झाले आहेत. त्यामुळे भक्तिमय वातावरण कोठेच दिसत नसून मंदिर परिसर ओस पडला आहे. संपूर्ण देश लवकरात लवकर करोनामुक्त व्हावा आणि आम्हाला आमच्या लाडक्या देवाचे दर्शन व्हावे अशी प्रार्थना नागरिकांमधून होऊ लागली आहे.
प्रतिक्षा दर्शनाची…
देशातील महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक व उत्तर प्रदेश या चार राज्यातील भाविकांचे कुलदैवत असणारी मंदिरे सातारा जिल्ह्यात आहेत. त्यामुळे लाखो भाविकांचा राबता या मंदिर परिसरात असतो. नेहमीच ही मंदिरे गर्दीने खचाखच भरलेली असतात. परंतु, करोनामुळे मंदिरेच कुलूपबंद असल्याने अनेक भाविक देवदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.
फलटणचे श्रीराम मंदिर बंद
फलटण(प्रतिनिधी) – नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटणच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील अनेक देवस्थानांची नित्य व्यवस्था व देखभाल पाहण्यात येत असून सुमारे 300 वर्षांपासून येथील श्रीराम मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जिल्हा प्रशासनाचे निर्देशानुसार हे मंदिर बंद ठेवण्याचा आणि श्रीराम नवमी उत्सव, श्री जानाई देवी यात्रा, राजाळे (ता. फलटण) तसेच श्री जावलसिद्धनाथ यात्रा, जावली (ता. फलटण) या तिन्ही धार्मिक उत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
श्रीराम मंदिर हे फलटणसह परिसरातून आणि परगावाहुन येथे येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज पहाटेपासून हे मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले असते. सुमारे 300 वर्षे ही परंपरा अखंडित सुरु असून करोना या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने करोना या रोगाचा प्रसार सर्व ठिकाणी वाढत असल्याने धार्मिक उत्सव, यात्रा वगैरे अनेक लोक एकत्र येणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध केला आहे. 2 एप्रिल 2020 रोजी साजरा होणारा रामनवमी उत्सव व त्यापूर्वी गुढी पाडव्यापासून श्रीराम मंदिरात सुरु होणारे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन रद्द करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे 13 व 14 एप्रिल 2020 रोजी राजाळे येथे प्रतिवर्षी साजरी होणारी श्री जानाई देवीची वार्षिक यात्रा आणि 13 ते 17 एप्रिल दरम्यान जावली येथे प्रतिवर्षाप्रमाणे साजरी होणारी श्री जावल सिद्धनाथाची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. फलटण येथील श्रीराम मंदिर भाविकांना दर्शनासाठी आजपासून बंद ठेवण्यात आले आहे, मात्र तेथील पुजारी यांच्या मार्फत नित्य पूजा सेवा सुरु राहणार असल्याचे संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पाल :करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना राबविल्या जात आहेत. गर्दी होणारी ठिकाणी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक ठिकाणची मंदिरा बुधवारपासूनच बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पाल येथील खंडोबा मंदिर गुरुवारपासून “करोना’च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद करण्यात आले. भाविकांनीही दर्शनासाठी गर्दी करु नये अशा सूचना करण्यात आल्या असून मंदिराचे प्रवेशद्वारच बंद करण्यात आले आहे.