श्रीगोंदा – मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील बहुसंख्य भागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. काही ठिकाणी तर ओल्या दुष्काळाची चाहूल दिसू लागली आहे. श्रीगोंदा तालुका हा तसा परतीच्या पावसावर अवलंबून असतो. मागील अनेक वर्षे मोसमी व परतीच्या दोन्ही पावसाने दगा दिला होता.
दुष्काळाच्या झळा गतवर्षी सोसाव्या लागल्या. खरीप तर अनेकदा हातचे गेले. रब्बीची शास्वती उरली नव्हती. यंदा गोकुळाष्टमीनंतर रब्बीच्या पेरणी झाल्या. प्रारंभी पावसाने ओढ दिली. अधूनमधून हलका पाऊस पडला. हस्त नक्षत्रात कडाक्याच्या विजा व धो-धो पाऊस अनेक वर्ष रुसला होता.
यंदाही तो जेमतेम झाला. परंतु त्यानंतरच्या चित्रा व स्वाती नक्षत्राने मात्र शेतकऱ्यांच्या पदरी भरभरून माप टाकले. ज्वारीच्या पेरण्या उशिरा झाल्याने आता शेतात वापसा होण्याची गरज आहे. पाऊस सारखा पडत राहिला तर आहे ते पीक वाया जाण्याची चिन्हे आहेत. भाजीपाला, कांदा, टोमॅटो व फळभाज्यांचे पावसाने नुकसान केले आहे. नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर श्रीगोंद्याची वार्षिक सरासरी 522 मीमी होती. यंदा येथे 623 मीमी पाऊस पडला आहे. तुलनेने पेडगाव (349 मीमी), काष्टी (338 मीमी) व मांडवगण (369 मीमी) या मंडळांनी सरासरी गाठलेली नाही. कोळगाव (757 मीमी) सर्कल तालुक्यात सर्वात आघाडीवर आहे. सरासरीच्या दीडपट पाऊस तेथे झाला आहे. चिंबळे (461 मीमी), बेलवंडी (458 मीमी), देवदैठण (391 मीमी) या तीन सर्कलमध्ये समाधानकारक पाऊस नोंदला गेला आहे. पावसाने उघडीप न दिल्यास आहे ते पीक हातचे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.