वनविभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही काम करण्यास मनाई
शिंदे वासुली- श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर शिंदे वासुली ग्रामपंचायतीचे हद्दीत येत असून डोंगर वनविभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत किंवा सेवाभावी संस्थांना इच्छा असून भाविक व पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने देहू-आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखडा करताना भंडारा डोंगराला सामाविष्ट करून त्याही तीर्थक्षेत्राचा विकास होत आहे; परंतु ज्या डोंगरावर महाराजांना ईश्वर साक्षात्कार झाला तो भामचंद्र डोंगर अजूनही दूर्लक्षितच आहे.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्याने भामचंद्र डोंगराला “क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा प्राप्त करून दिला. त्या अनुषंगाने का होईना डोंगरावर मुलभूत सोयी-सुविधा होतील, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत; परंतु वनविभागाच्या पूर्वसंमती शिवाय म्हणजेच डोंगरावर कोणतेही काम करण्यास मनाई असल्याने भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी काहीच करता येणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. शरद बुट्टे पाटलांनी वन खात्याचा नियमभंग न करता डोंगराच्या पायथ्याशी शासकीय निधी उपलब्ध करून देऊन सभामंडप, धर्मशाळा, पाणीयोजना, रस्ते आदि कामे करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी डिसेंबर महिन्यात सालाबादप्रमाणे होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे पूर्वनियोजन करण्यासाठी डोंगराच्या पंचक्रोशीतील सप्ताह समितीची नुकतीच बैठक झाली.
समितीच्या सदस्यांनी वनविभाग जर लोकवर्गणीतून कोणतीच सुधारणा, मुलभूत सुविधा करण्यास परवानगी देत नसेल, तर अजिंठा-वेरुळच्या धर्तीवर वनविभागाने डोंगराचा तीर्थक्षेत्र विकास करण्याची मागणी केली आहे. यावेळी हभप किसन पिंजण, सुनील देवकर, कैलास लिंभोरे, कृष्णकांत सांडभोर, तुकाराम तरस, मालक पाचपुते, संतोष बुट्टे, मारुती आंद्रे, दत्तात्रय टेमगीरे, शांताराम केंदळे, शिवाजी कावरे, सुनील घनवट, बाजीराव हंबीर, बाळासाहेब पवार, दत्तात्रय शेटे, दत्तात्रय लांडगे, मारुती लिंभोरे, रोहिदास पडवळ, बाळासाहेब लिंभोरे, दत्ता लिंभोरे, दत्तात्रय करंडे, संदिप बोत्रे आदि समिती सदस्य उपस्थित होते.
- गिरीश बापट यांच्या माध्यमाततून भामचंद्र डोंगराला “क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासकीय निधी देणे शक्य होणार असून नुकताच पायथ्यापर्यंत रस्ता, पाणी योजना, हायमारस्ट दिवा आदि कामे मंजूर असून वासुली ग्रामपंचायत वेळेत कामे पूर्ण करील.
– शरद बुट्टे पाटील, सदस्य, जिल्हा परिषद - भाविकांना डोंगरावर येण्याजाण्यासाठी दगडी पायऱ्या होणे गरजेचे आहे. वन खात्याने आम्हाला काम करण्यास परवानगी द्यावी अथवा त्यांनीच कामे करावीत. जेणे करुन तीर्थक्षेत्र विकास होऊन पर्यटन वाढीस चालना मिळेल. या कामी नवनिर्वाचित आमदार दिलीप मोहिते पाटील यांची मदत घेता येईल.
– कैलास लिंभोरे, खेड तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस