मुंबई – 2020 या वर्षात करोनामुळे भारतातील स्थानिक क्रिकेटचे मोठे नुकसान झाले असून अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. परंतु आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहेत व भारतात स्थानिक क्रिकेटची सुरुवात आगामी कालावधीत सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेने होत आहे.
10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेला सुरुवात होत असतानाच मुंबई संघाला मोठा झटका बसला आहे. मुंबई व भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
रिपोर्टसनुसार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याने दौऱ्यातील सराव सत्रात जास्त फलंदाजी देखील केली नाही.
दरम्यान, सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेसाठी जय्यत तयारी करणाऱ्या मुंबई संघासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने 3 संघ निवडले असून हा संघ 21 ते 25 डिसेंबरपर्यंत 3 सराव सामने खेळणार आहेत. या सराव सामन्यातील कामगिरीद्वारे अंतिम संघ निवडला जाणार आहे.