लखनऊ – उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात शुक्रवारी भीषण अपघात घडला. रात्री अकरा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून प्रवाशांनी भरलेला टेम्पो रस्त्यावर पडलेल्या विटांमुळे उलटला. यादरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने टेम्पोतील काही प्रवाशांना चिरडले. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघेजण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इकौना तहसील जवळ विटांनी भरलेली ट्राॅली रात्री पंक्चर झाली होती. दुसरे वाहनाची ट्राॅलीला धडक बसू नये यासाठी ट्राॅलीवाल्याने काही विटा ट्राॅलीच्या मागे-पुढे ठेवल्या होत्या. याचदरम्यान बलरामपूर येथील उतरौलातील हाशिम पारा पेडिया गावचे नऊ लोक एका टेम्पोने बहराइच येथील दर्ग्यावरून घरी परतत होते.
यावेळी इकौना तहसीलजवळ अचानक समोरून आलेल्या ट्रकचा लाईट टेम्पो चालकच्या चेहऱ्यावर आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्यात असलेल्या विटांमुळे टेम्पो पलटी झाला. त्यातच समोरून येणाऱ्या ट्रकने टेम्पोतील पाच जणांना चिरडले. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी असल्याचे स्थानिक पोलिसांनी माहिती दिली आहे.