जळगाव- महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज धाडी पडत आहेत. आपले दोन नेते तुरूंगात गेले आहेत. किमान आता तरी गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा. 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे.
जळगावातील एका सभेत बोलताना खडसेंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर देखील ताशेरे ओढले आहेत. जे एकेकाळी माझे पाय धरायचे. माझा आशिर्वाद घ्यायचे, तेच आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत, अशी टीका खडसेंनी केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी हे मोठे वक्तव्य केले त्यावेळेस व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. खडसेंच्या या वक्तव्यानंतर भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना वेग आला आहे. एकापाठोपाठ एक महाविकास आघाडीतील अनेक मंत्री व नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले. या कारवायांवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली.