मुंबईः सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेलं आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती करतोय. आता हा अधिकार आपला आहे, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आपण काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणाच्या मुद्दावर दाखवा अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनतेला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सर्व राजकीय पक्षांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास केला. मात्र सर्वोच्च न्यायालयात आपण आरक्षणासाठीचा निराशाजनक निकाल आला. मराठा आरक्षण रद्द करणे दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात हरला, असं कोणी तरी म्हणालं. तुम्हाला लढताच आलं नाही. ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयात विजय प्राप्त करून दिला. बाजू मांडली, तेच वकील किंबहुना त्यात कोणताही बदल न करता ही लढाई आपण समर्थपणाने सर्वांचं मत एकत्र घेत लढल्याच सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिलं.
मी मराठा समाजाला एक वेगळ्या दृष्टीनं धन्यवाद देतोय. त्यांनी फार समंजसपणानं हा निर्णय स्वीकारलेला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी अत्यंत समंजसपणे आपली प्रतिक्रिया दिलीय, असं ही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय.
मराठा आरक्षणप्रकरणी अशोकरावांनी व्यवस्थित बाजू मांडलेली आहे. मी पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती करतोय. आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आपण काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी जे दोन निकाल दिले होते. शाहबानो खटला आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट असेल. तोसुद्धा संसदेनं आपल्या अधिकारांचा वापर करून बदलला, याची आठवण करून देत मराठा समाजासाठी केंद्र सरकारने अशीच संवेदनशीलता दाखवी, असंही मुख्यमंत्री म्हणाले.