लोणी काळभोर -पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुठल्याही दुकानात किंवा कार्यालयात पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र आले, तर त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी पोलिसांना दिले आहेत.
विना मास्क घराबाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांच्या बरोबरच, ग्रामीण भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील व्यापारी आस्थापनात पाच अथवा पाचपेक्षा जास्त एकत्र येणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1/3) अंतर्गत दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सुचनेनुसार, मागील अठरा दिवसांच्या काळात ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्या 51 हजार नागरिकांच्यावर जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारून, तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा दंडही वसूल केला. नागरीक स्वतःहून काळजी घेत नसल्यानेच, पोलिसांना कठोर कारवाई करण्याची गरज भासत असल्याचेही मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना प्रभारी पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते म्हणाले, करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर काम करत आहे. करोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मास्कचा वापर हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याने, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरु केलेली आहे. ही कारवाई सुरू असली तरी, अनेक व्यापारी आस्थापनात (खासगी दुकानात) पाच अथवा पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.
रांजणगाव पोलिसांकडून सर्वाधिक दंडवसुली
जिल्ह्यात एकतीस पोलीस ठाणी असून, विना मास्क विरोधातील कारवाईत रांजणगाव पोलीस ठाण्याने सहा लाख रुपयांचा दंड वसुल करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बारामती तालुका पोलीस ठाण्याने पाच लाख पाच हजार रुपयांचा दंड वसुल करुन द्वितीय तर लोणावळा शहर पोलिसांनी चार लाख नव्वद हजार रुपयांचा दंड वसुल करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.