नवी दिल्ली – जपानमध्ये येत्या जुलैमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघाची निवड येत्या शनिवारी होणार आहे, अशी माहिती भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी दिली.
देशात अद्याप करोनाचा धोका कायम असल्यामुळे मूळ संघाबरोबरच दोन राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात येणार आहे. भारताचे पंधरा खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, केवळ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धाच नव्हे तर या खेळाडूंनी गेल्या दोन मोसमात केलेल्या कामगिरीचाही निकष या निवडीदरम्यान लावला जाणार आहे.
संघाची निवड झाल्यावर खेळाडूंना आगामी काळात कसे वेळापत्रक ठेवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेपूर्वी त्याना विलगीकरणात तसेच बायोबबल सुरक्षेतही राहावे लागणार आहे.