सातारा – सातारा जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू रुचिरा लावंड हिने गुरुवारी स्वतःच्या विवाह सोहळ्यासाठी थेट हेलिकॉप्टर मधून अनोखी एन्ट्री केली. तिच्या या आगमन शैलीचे साऱ्यांनाच कौतुक वाटले. हा विवाह सोहळा कास पठार परिसरातील हेरिटेज वाडी या प्रशस्त हॉटेलच्या दालनात रंगला. या अनोख्या विवाह सोहळ्याची आणि रुचिराच्या ग्रॅंड एंट्री ची साताऱ्यात चर्चा चांगलीच रंगली होती.
रुचिरा ही मूळची सातारा जिल्ह्यातील असून ती सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे मुख्य कार्यालय अधिक्षक पदावर कार्यरत आहे. रुचिराने पुणे येथे बालेवाडी स्टेडियम मध्ये झालेल्या 55 व्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेत रेल्वेच्यावतीने खेळताना नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर प्रोन या क्रीडा प्रकारात दोन सुवर्णपदक पटकावले असून ती छत्रपती पुरस्कार विजेती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने राष्ट्रकुल स्पर्धेतही चमकदार कामगिरी नोंदवत भारतासाठी दोन पदके मिळवली आहेत.
अशी ही साताऱ्याची कन्या स्वतःच्या लग्न सोहळ्यासाठी थेट हेलिकॉप्टरने हेरिटेज वाढीच्या प्रांगणात उतरल्याने सातारकर आश्चर्यचकित झाले. खानदेशातील नामवंत व्यावसायिक कुलदीप सपकाळ यांच्याशी रुचिरा ही तिचे मोजके कुटुंबीय आणि सहकारी मित्र यांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाली.
मात्र, हा अनोखा सोहळा रुचिराच्या हेलिकॉप्टरमधून झालेल्या एन्ट्रीमुळे सगळ्यांच्या चांगलाच लक्षात राहिला. हे हेलिकॉप्टर सातारा शहरानजीकच्या शाहूनगर परिसरातही उतरल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. गुरुवारी दिवसभर सातारा शहर परिसरात हेलिकॉप्टरची घरघर ऐकू येत होती. या विवाह सोहळ्यासाठी रुचिराची कोल्हापूरची मैत्रीण राही सरनोबत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केलेले अनेक नेमबाजपट्टू आले होते.या अनोख्या विवाह सोहळ्याची आणि रुचिराच्या ग्रॅंड एंट्रीची साताऱ्यात चर्चा चांगलीच रंगली होती.