मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी आज कोरोना संसर्गाविषयी व त्या संदर्भात चालू असलेल्या घटनांसंदर्भात महाराष्ट्रातील व देशातील जनतेला उद्देशून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जनतेने लाॅकडाऊन गांभीर्यानं घ्याव असे आवाहन केले. तसेच दिवे लावून परिणाम होणार असेल तर लावावेत पण मोदींच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता अशीही टीका राज यांनी केली.
पत्रकार परिषदेतील ठळक महत्वाचे मुद्दे :
१) माझी सर्वांना विनंती आहे की लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावे. रेशन, भाजीचे प्रश्न आहेत ते अनेक ठिकाणी उपलब्ध आहे आणि सरकार उपलब्ध करतंय. लाॅकडाऊन हे गांभीर्याने घेतलं नाही आणि आणखी दिवस वाढवले तर त्याचे परिणाम उद्योगधंद्यासह सर्वांवर होईल.
२) हात जोडून विनंती आहे, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल.
३) लोकांना भीती आहे नोकरी राहील का, भाजीपाला मिळेल का, रेशन मिळेल का वगैरे हे लोकांमधील संभ्रम सरकराने दूर करावेत. काहीजण शिस्त पाळत नाहीत, त्यामुळे आज ही वेळ आलीय.
४) पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता.
५) वसईत मरकज कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्याबद्दल मी पोलिसांचं अभिमंदन करतो.
६) मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला?
७) भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. लॉकडाऊन हे थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे.
८) जर लोक असेच वागणार असतील तर लॉकडाऊन आणखी वाढेलच. डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना पेशंट शोधायलाच वेळ जाईल, घरी लोक लपून बसलेत, लक्षणे आढळलेल्यांनी स्वत: पुढे आले पाहिजे.समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवे.
९) पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करणं योग्य नाही, ते १२-१४ तास काम करतात. पोलिसांकडून चुका होऊ शकतात, मात्र ही वेळ नाही.
१०) हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे, निवडणुकीवेळी कुणाला मतदान करायचं सांगता, मग अशावेळी तुम्हाला सांगता येत नाही का?
११) माध्यमांचंही अभिनंदन आणि आभार. पत्रकार सर्वत्र फिरून बातम्या गोळा करत आहेत, मात्र त्यांनाही कुटुंब आहे.