केंद्रीय मंत्री सुरेश आंगडी यांचे वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून देशात हिंसक आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री सुरेश आंगडी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालावेत, असे गंभीर वक्तव्य सुरेश आंगडी यांनी केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सध्या हिंसक आंदोलन सुरू आहे. पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यात काही आंदोलकांनी रेल्वेगाड्यांचे नुकसान केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरेश आंगडी यांनी हे वक्तव्य केले.
सुरेश आंगडी यांच्याकडे रेल्वेच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे. जर कोणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत असेल मग त्यामध्ये रेल्वेचे नुकसानही आले तर अशा हिंसक आंदोलकांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश मंत्री म्हणून मी देत असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हा प्रशासनाने आणि रेल्वे प्रशासनाने या संदर्भात कडक पावले उचलण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
विरोधकांकडून काही समाजकंटकांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच देशात हिंसक आंदोलन केले जात असल्याचा आरोप सुरेश आंगडी यांनी केला. देशाच्या सध्याच्या नागरिकांना या कायद्यामुळे कोणतीही बाधा पोहोचणार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या अल्पसंख्यकांना भारताचे नागरिकत्व देण्यासंदर्भातील तरतूद सुधारित कायद्यात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
काही जण विनाकारण या विषयावरून देशातील कायदा-सुव्यवस्था बाधित करण्याचे आणि देशाची अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचे काम करीत आहेत. कॉंग्रेसचा याला पाठिंबा आहे. त्यामुळे मी या कृतीचा तीव्र निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.