दुमका – सशस्त्र गुन्हेगारांवर गोळ्या चालवण्यास अजिबात कचरू नका असा जाहीर सल्ला झारखंडचे पोलिस महासंचालक एम. व्ही. राव यांनी दिला आहे. गुरूवारी त्यांनी एका उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील गुन्हेगारी स्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की अनेक पोलिस अधिकारी बंदुका चालवण्यास कचरतात. पण जेव्हा गरज असेल त्यावेळी बिनदिक्कत गोळ्या चालवा असा सल्ला आपण पोलिसांना दिला आहे असे त्यांनी नमूद केले.
पोलिसांनी जनतेच्या संरक्षणासाठी सशस्त्र गुन्हेगारावर गोळ्या चालवल्या आणि त्यात तो गुन्हेगार जखमी वा ठार झाला तर ते कृत्य पुर्णपणे कायदेशीर आहे. त्यातून गोंधळून जाण्याचे कारण नाही. असेही त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जर एखादा गुन्हेगार उघडपणे शस्त्र घेऊन हिंडत असेल तर तो केवळ गंमत म्हणून किंवा पुजा विधी करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने हिंडत नसतो. तो कोणाचा तरी जीव घेण्यासाठी टपलेला असतो.
अशा स्थितीत त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यास अजिबात मागेपुढे पाहू नका अशी सूचना आपण पोलिसांना दिली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शस्त्र बाळगल्याबद्दल ज्यांना अटक झाली आहे पण ज्यांना नंतर जामीन मिळाला आहे ते लोक सध्या काय करीत आहेत याची माहिती जमा करण्याचा आदेशही आपण पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे असे त्यांनी नमूद केले.
एखादा गुन्हेगार लोकांच्या जीवितावर किंवा मालमत्तेवर उठला असेल तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई केलीच पाहिजे असे ते म्हणाले.