कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यात पत्र्याच्या पेटीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्रीच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मानोली धरण परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या धरणाच्या मागील बाजूला रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर बेवारस स्थितीत पडलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयिताने महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून मानोली लघु पाटबंघारे जलाशयाच्या परिसरात टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पत्र्याच्या पेटीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान ही महिला कोण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याने मृतदेह फारसा चांगल्या परिस्थितीत नाही. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र लवकरच या प्रकरणाचा छडा लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.