सांगली – गव्हाचे खळे सुरू असताना मळणी यंत्रात साडी अडकून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खानापूर तालुक्यातील करंजे गावात गुरूवारी (ता.11) घडली आहे. सुभद्रा विलास मदने (वय-50) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करंजे येथील मदनेमळा येथे सुभद्रा मदने या आपल्या शेतात मळणीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. गव्हाचे खळे सुरू होते. त्यावेळी खाली सांडलेले गहू वेचताना त्यांची साडी यंत्रात अडकली आणि त्या मळणीयंत्रात खेचल्या गेल्या. लगेच मळणीयंत्र बंद करण्यात आले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सुभद्रा यांचा जागीच मृत्यू झाला.
दुर्घटना एवढी भीषण होती की, त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले होते. घटनास्थळावरील दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. घटनेची माहिती मिळताच विटा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.