वाशीम – मागील एक वर्षापासून राज्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपासून राज्यात तरुणांच्या आत्महत्या वाढल्या असून सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या होत आहेत. अशीच घटना विदर्भातील वाशीम जिल्ह्यातून समोर आली आहे.
शिरपूर जैन येथील ऋषिकेश अंबादास जाधव या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ‘सॉरी फ्रेंड्स’ असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून ऋषिकेश जाधवने गळफास घेतला. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ऋषिकेशचे मित्रही या घटनेमुळे अस्वस्थ झाले आहेत.
ऋषिकेश वाशीमच्या रुग्णालयात कॉन्ट्रॅक्ट बेसवर वार्ड बॉय म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी तो ड्युटी करून आपल्या गावी शिरपूर येथे परतला होता. शनिवार 20 मार्च रोजी तो दिवसभर घरी होता. शनिवारी रात्री ऋषिकेशने कुटुंबीयांसोबत जेवणही केले. तोपर्यंत सर्व सुरळीत होते. मात्र रात्री साडेनऊ वाजता त्याने व्हॉट्स ऍपवर ‘सॉरी फ्रेंड्स’ असं स्टेटस ठेवलं. त्यानंतर सकाळी सहा वाजता गळफास घेऊन आपलं जीवन संपवल.