नवी दिल्ली : सिंधु बॉर्डर ज्याठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते त्याठिकाणी एका युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. युवकाचा हात कापून बॅरिकेड्सला लटकवला आहे. मृतदेह आढळल्यानंतर सिंधु बॉर्डरवर मोठी खळबळ माजली. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला पोलिसांना मुख्य व्यासपीठाजवळ जाण्यास रोखले परंतु त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवला.
सिंधु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या मुख्य व्यासपीठावर सकाळी हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. मृत युवकाचे वय ३५ वर्ष होते. युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. ज्या युवकाला मारले त्याचा डावा हात कापण्यात आला होता. युवकावर गुरु ग्रंथ साहिबची बदनामी केल्याचा संशय होता. या हत्येचा आरोप निहंगांवर लावण्यात आला आहे.
निहंगांचा आरोप आहे की, युवकाला षडयंत्र म्हणून इथं पाठवण्यात आले होते. त्यासाठी त्याला ३० हजार रुपये दिले होते. युवकाने पवित्र गुरु ग्रंथ साहिबचे भंग केला. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या ३ कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ९ महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे.
शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही. कृषी विधेयकं मागे घ्यावीत अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. तर विधेयक मागे घेतले जाणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार विधेयकात बदल करण्याची सरकारची तयारी आहे.