भोपाळ – मध्यप्रदेशातील बालाघाट येथे दुर्गापूजेदरम्यान वर्गणी न दिल्यामुळे 14 आदिवासी कुटुंबावर गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार घातल्याची धक्कादायक घटना घडली.
सुरुवातीला गावातच हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांच्यावरील बहिष्कार तसाच ठेवण्यात आला. शेवटी या कुटुंबांनी बालाघाट जिल्हा पोलीस मुख्यालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
बालाघाट जिल्ह्यातील मोते या गावचे हे कुटुंबे आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, दुर्गा उत्सवादरम्यान 201 रुपयांची वर्गणी गावच्या गुंड मुलांनी मागितली. मात्र करोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांनी केवळ 150 रुपये वर्गणीसाठी दिले. केवळ 50 रुपये वर्गणीत कमी दिले होते.
मात्र तरीही गावकऱ्यांनी कमी वर्गणी दिली म्हणून या कुटुंबांवर बहिष्कार घातला आणि त्यांचे राशनपाणी बंद केले. पोलिसांनी पीडितांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार अनुसूचित जमातीवर सर्वाधिक 1 हजार 868 अन्याय झाल्याचे खटले मध्यप्रदेशात दाखल आहेत. त्यानंतर 1 हजार 95 खटले राजस्थान आणि 388 खटले छत्तीसगढ राज्यात दाखल आहेत.