नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग सातत्याने वाढत आहे. देशात गेल्या चोवीस तासात 81,466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. देशात येत्या 15 ते 20 दिवसात कोरोनाचा स्फोट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणं नोंद केली आहेत. त्यात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही येत्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचे मतही मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, येत्या 15 ते 20 दिवसात रोज 80 हजार ते 90 हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. देशात गेल्या चोवीस तासात 81,466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 50,356 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात गुरुवारी एकाच दिवशी 43 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचे संकट वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.