नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 झाला आहे. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 6 हजार 977 कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 तासात 154 मृत्यूमुखी पडले.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 हजार 21 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 721 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे. तर मागील 24 तासांत 3 हजार 280 कोरोनामुक्त झाले. भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 77 हजार 103 आहे.
भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 3 हजार 41 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 231 झाला आहे. त्यातील 14 हजार 600 बरे झाले. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.06 टक्के आहे. तर मृतांचा आकडा 1635 आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले रुग्ण 33 हजार 988 आहे. मुंबईत 30 हजार 542 कोरोनाबाधित असून त्यामधील 988 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर केरळमध्ये 847 रुग्ण असून त्यातील 521 बरे झाले आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 61.51 टक्के आहे. गेल्या दहा-बारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 61 टक्क्यांवर आला आहे.