बिहार येथील कामगाराचा मृत्यू
पिंपरी – पोट भरण्यासाठी बिहार येथून उद्योगनगरीत आलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. परंतु मृतदेह नेण्याइतपतही त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नसल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये अंतिम संस्कार करावे लागले. मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अंतिम दर्शन घेतले. करोनाच्या धास्तीने माणुसकी दाखवायची कशी असा प्रश्न करोना काळात नागरिकांना पडल्याने पिंपरी येथील प्रसाद कुमार गुप्ता (वय 42) यांचा मृतदेह सहा तास घरात पडून राहिला.
गुप्ता हे पिंपरीतील महात्मा फुले नगर येथे कुटुंबासह राहायचे. बिहारमधून कामानिमित्त पिंपरीत स्थायिक झाले होते. लॉकडाऊन झाल्याने गुप्ता कुटुंबाला घेऊन त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेले. मात्र, काही दिवसांनी परिस्थिती सुधारल्याने गुप्ता कुटुंबाला बिहार येथे ठेवत एकटेच शहरात परतले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्याचा राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी घराबाहेर का येत नाही हे पाहिले असता त्याचा मृत्यू झाला.
करोना असेल या भीतीने कामगाराचा मृतदेह सुमारे सहा तास घरातच पडून होता. मृतदेहाला कोणीही हात लावायला तयार नव्हते. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमुळे त्या कामगाराच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
अखेर माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव यांनी पुढाकार घेत मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करत शुक्रवारी भोसरी येथील विद्युत दाहिनीमध्ये विधिवत अंत्यसंस्कार केले. करोनाच्या भीतीने कोणीही मृतदेहाला हात लावण्यास किंवा बाहेर काढण्यास पुढे येत नव्हते. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह घरातच पडून होता. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येऊन सहकारी मित्रांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.