नगर – कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलीची हत्या करत पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना नगर शहरातील केडगाव उपनगरातील अथर्वनगर भागात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. संदीप दिनकर फाटक (वय 45), त्यांची पत्नी किरण (वय 32) मुलगी मैथिली (वय 10) अशी यातील मृतांची नावे आहेत.
दरम्यान, मुलीचा खून केल्याप्रकरणी मृत पती-पत्नीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाटक यांची केडगाव येथे किराणा मालाची एजन्सी आहे. त्यासाठी त्यांनी अनेक बॅंकांकडून कोट्यवधीचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकले होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
शवविच्छेदन अहवालात तिघांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे म्हटले आहे. आत्महत्यापूर्वी पती-पत्नीने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठी पत्नीने लिहिली असून, चिठ्ठीच्या शेवटी पती-पत्नीच्या सह्या आहेत.
मुलीला गळफास दिल्यानंतर या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.फाटक हे अथर्वनगर परिसरात भाडोत्री राहत होते. त्यांची किराणा मालाची एजन्सी आहे. सकाळच्या वेळी फाटक यांच्याकडे कामाला असलेल्या मुलगा त्यांच्या घरी आला होता. परंतु घराचा दरवाजा बंद होता.
दरवाजा वाजवून दरवाजा उघडत नव्हते. त्याने फाटक यांना फोन केला. परंतु फोन कोणी उचलत नव्हते. त्याने खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने जवळच राहत असलेल्या फाटक यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक मानगावकर, कर्मचारी हे घटनास्थळी गेले. घरातील बेडरुममध्ये मुलीचा, तिच्या आईचा मृतदेह आढळून आला. तर संदिप फाटक यांचा मृतदेह बेडरुममधील फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
बेडरुममध्येच एक चिठ्ठी ही पोलिसांना मिळाली असून, त्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यावर पती-पत्नीने सही केलेली आहे. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आले. त्यात तिघांचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मुलीला गळफास देऊन तिचे जीवन संपविल्यानंतर पती-पत्नीची आत्महत्या केली असल्याचे प्राथमिकदृष्टा स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
कर्जामुळे होते तणावाखाली…
फाटक यांनी व्यावसायासाठी विविध बॅंकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु ते आपले कर्ज फेडू शकले नव्हते. त्यामुळे फाटक हे तणाखाली होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली आहे.
तिघांचा मृत्यू हा गळफास घेऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या घरात सापडलेल्या चिठ्ठीवरून पती-पत्नीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. मुलीला गळफास दिल्यानंतर फाटक दाम्पत्याने आत्महत्या केली.
– राकेश मानगावकर, पोलीस निरीक्षक