भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत एका धक्कादायक घटना घडली आहे. गॅस शवदाहिनीमधील गॅस अचानक संपला. त्यामुळे शवदाहिनीतील मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसांनी गॅस भरण्यात आल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले. मात्र तोपर्यंत पार्थिव तिथेच पडून राहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीमध्ये शनिवारी रात्री एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला होता. नातेवाईकांना गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करायचे असल्याने मृतदेह गॅस शवदाहिनीत ठेवण्यात आला. शवदाहिनीचे यंत्र सुरु असताना ते अचानक बंद पडले, त्यावेळी गॅस पुरवठा बंद झाला असल्याचे कर्मचार्याच्या लक्षात आले.
गॅसचा पुरवठा करणारे सिलेंडर रिकामे झाले असल्यामुळे त्या दिवशी पूर्ण अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. परिणामी मृतदेह अर्धवट अंत्यसंस्कार झालेल्या स्थितीत तीन दिवस गॅस शवदाहिनीमध्येच पडून होता, अशी धक्कादायक बाब समोर आली. अखेर तीन दिवसांनी सिलेंडरमध्ये गॅस रिफिल केल्यानंतर बुधवारी रात्री शवदाहिनी सुरु करुन अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आले. या घटनेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
दरम्यान, गॅस शवदाहिनीचा करोना काळ वगळता फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचे नातेवाईक शवदाहिनी ऐवजी लाकडावरच अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शवदाहिनीवर होत असलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. आता या घटनेची चौकशी करुन जबाबदार व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेआहे.