रूपाली ठोंबरे-पाटील यांच्या सहकार्याने झाली सुटका
पुणे- हैदराबादमधील सिकंदाराबाद येथे वादनासाठी गेलेल्या ढोल-ताशा पथकातील वादकांना वादनाची सुपारी देणाऱ्या हैदराबादमधील एका व्यक्तीकडून डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील काही मुलांनी याबाबत मनसेच्या महिला शहराध्यक्षा आणि माजी नगरसेविका ऍड. रूपाली पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीनं हैदराबादमधील परिचयातील राजकीय व्यक्तींशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने या सर्वांची सुटका केली. तब्बल 60 जणांच्या या पथकात 15 मुली होत्या. या प्रकारामुळे या मुलींना मोठा धक्का बसला असल्याचे ऍड. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, हे पथक शनिवारी रात्री पुण्याकडे रवाना झाले आहे.
ऍड. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठान ढोल ताशापथक मागील आठवड्यात (दि.16 सप्टेंबर) रोजी हैदराबाद येथील सिकंदराबादमध्ये वादनासाठी गेले होते. या वादनाचे काम प्रेमचंद यादव नामक व्यक्तींकडून त्यांना चार दिवसांच्या
वादनासाठी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल करण्यात आले होते. त्यानुसार, पथकाने 22 सप्टेंबरपर्यंत वादन केले. त्यानंतर हा ग्रुप 23 तारखेला पुण्याकडे निघाला, त्यावेळी यादव यांनी या पथकास याच पैशात आणखी दोन दिवस वादन करण्याची जबरदस्ती केली तसेच या पथकाच्या गाडीची कागदपत्रे काढून घेत त्यांना डांबून ठेवले.
त्यानंतरही पथकाने वादन करण्यास नकार दिला. त्यानंतर या मुलांनी वारंवार वाद घातला मात्र, त्यांची कागदपत्रे देण्यास तसेच जाऊ देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे या पथकातील मुली प्रचंड घाबरल्या होत्या.मात्र, हैद्राबाद मध्ये आपण अडचणीत सापडल्याचे लक्षात येताच; या पथकातील काही जणांनी परदेशी आणि ऍड. पाटील यांच्याशी शनिवारी सकाळी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तातडीनं मदतीची सूत्रे हलविली.
अशी झाली पथकाची सुटका
हे पथक अडकल्याची माहिती मिळताच, ऍड पाटील यांनी तातडीनं संबंधित ठिकाणच्या माजी नगरसेविका बसम्मा पुजारी यांच्याशी संपर्क साधत त्यांना ही माहिती दिली. या नगरसेविकेने तातडीनं कार्यकर्त्यांचे पथक संबंधित मुलांच्या जवळ पाठविले तसेच स्थानिक पोलिसांनाही त्यांची कल्पना दिली. त्यानंतर पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते राजाभैय्या ठाकर यांनाही या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देत मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी या सर्व पथकास केसरियाबाद पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना कागदपत्रे परत देण्यासह इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून या मुलांना शनिवारी सायंकाळी पुण्याकडे रवाना केले असल्याचे ऍड. पाटील यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.