नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनामुळे कुठे तरुण मंडळी तर कुठे वयोवृद्ध असणाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. तर देशात कोरोनाने संपूर्ण कुटुंब संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर महिलेनं आपल्या दोन मुलांसह विष घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.
गुजरातमधील द्वारका शहरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. द्वारका शहरातील रहिवासी जयेशभाई जैन हे नाश्त्याचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. ते पत्नी साधनाबेन जैन आणि कमलेश व दुर्गेश यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते. जयेशभाई जैन यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला. शुक्रवारी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं. जयेशभाई यांच्यावर शुक्रवारी सकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुले घरी परतली.
घरी परतल्यानंतर तिघांनीही विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचेच करोनाने निधन झाल्याने तिघांनाही धक्का बसला होता. त्या तणावातच तिघांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक पी.बी. गढवी यांनी दिली. जयेशभाई हे मुळचे अमरेली जिल्ह्यातील असून, ते द्वारकेमध्ये भाड्याच्या घरात कुटुंबियांसह राहायचे. जयेशभाई हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना हा धक्का सहन झाला नाही. अती दुःख आणि तणावातून तिघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाची पुढील तपास केला जात आहे, असेही गढवी म्हणाले.
सकाळी ६ वाजता अंत्यसंस्कारवरून तिघेही घरी परतले. त्यानंतर तिघांनी विष प्राशन केले. दूध टाकणारी व्यक्ती जेव्हा घरी आली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडा असल्याचं दूधवाल्याच्या निदर्शनास आलं. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. त्यानंतर लगेच त्याने ही माहिती पोलिसांना देण्यात दिली आणि त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले.