नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रवास करणाऱ्या एका मुस्लीम पुरूष आणि एका विवाहित हिंदू महिलेस अजमेरला जाणाऱ्या रेल्वेमधून जबरदस्ती खाली उतरवले. त्यानंतर उज्जैन पोलिसांकडे या दोघांना सोपवल्याची घटना समोर आली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, १४ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेबाबत लव्ह जिहादचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेमधून उतरवलेल्या मुस्लीम व्यक्तीला मारहाणही केली. हा व्यक्ती एक दुकानदार आहे तर त्याच्यासोबत आढळलेली महिला ही एका खासगी शाळेत शिक्षका आहे.
रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) चौकशी केली आणि त्यांचे पालक येईपर्यंत त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बसण्यास सांगितले. त्यांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. तसेच, या प्रकरणी कोणी तक्रारदार नसल्याने बजरंग दलाच्या संबंधित कार्यकर्त्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
जीआरपीच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती आणि ती महिला इंदुरचे रहिवासी असून, कौटुंबिक मित्र आहेत आणि त्यांची अनेक वर्षांपासून ओळखही होती.
जीआरपीच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, “लव्ह जिहादचा आरोप करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आम्ही त्यांचे जबाब नोंदवले आणि ते दोघेही प्रौढ असल्याने आणि कोणताही गुन्हा नसल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले,” असे गुप्ता यांनी सांगितले.
तर, “पोलिस ठाण्यात आणताना त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करण्यात आल्याचे आम्हाला माहीत नव्हते आणि दोघांनीही आम्हाला सांगितले नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने आम्ही कोणताही गुन्हा नोंदवला नाही.”
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी सांगितले की, “विश्वसनीय सुत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, एका हिंदू महिलेला मुस्लीम व्यक्ती भुलवून स्वत:बरोबर घेऊन जात आहे. तेव्हा,आमच्या हिंदू भगिनीच्या रक्षणासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला तेव्हा तो माणूस आक्रमक झाला. ते त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. प्रक्रियेदरम्यान, माणूस आणि कामगारांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि निघून गेले,” चंद्रावत म्हणाले.