बीड : राज्यातील बीड जिल्ह्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीला परीक्षेला जाऊ न देता तिचा बालविवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 50 व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
ग्रामसेवकाच्या तक्रारीवरुन 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी चार बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले. परळीतील नंदाघोळ येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचा बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती बाल हक्क समितीचे तत्वशील कांबळे यांना मिळाली.
त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला याबद्दल माहिती देऊन हा बालविवाह रोखण्यास सांगितले असता पोलीस पोहोचण्याअगोदरच मुलगी आणि वऱ्हाडी मंडळी फरार झाले होते. त्यानंतर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरुन बालविवाह लावणाऱ्या 50 पेक्षा अधिक लोकांवर परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या मुलीचा विवाह लावण्यात येत होता तिची दहावीची परीक्षा सुरु असून तिला पेपरला न जाऊ देता तिचा विवाह लावण्यात येत होता.
परभणीत चार दिवसात नऊ बालविवाह रोखण्यात रोखण्यात प्रशासनाच्या पथकाला यश आले आहे. मागच्या चार दिवसात जिल्ह्यात नऊ बालविवाह रोखले गेले आहेत. बालविवाहमुक्त परभणी अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.