बेल्हे – आळे (ता. जुन्नर) येथे शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, शेतकऱ्यांना हक्काचा बाजारभाव द्या, अशी चिठ्ठी लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (दि. 17) वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दशरथ लक्ष्मण केदारी (वय 42) असे विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वडगाव आनंद येथील अरविंद वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. मृत केदारी हे वाघमारे यांचे चुलत दाजी आहेत. केदारी वाघमारे यांच्या मळ्यात राहत होते; मात्र शनिवारी घरी दिसत नसल्याचा फोन वाघमारे यांचे चुलत बंधू सागर वाघमारे यांनी केला. केदारी यांचा शोध घेताना त्यांचा शर्ट, चपला, मोबाइल शेततळयाच्या कडेला आढळले. ते शेततळ्यात मृतावस्थेत सापडले.
पोलिसांना पंचनामा करताना केदारी यांनी विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दशरथ याने आत्महत्या करण्याचा अगोदर चिठ्ठीत लिहीले आहे की, जीवनास कंटाळलो असून शेतीच्या पिकाला बाजारभाव मिळत नाही. करोनात बाजारभाव मिळाला नाही त्यातच अतीपावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली त्यात देणेकरी थांबायला तयार नाही कांद्याला योग्य भाव नाही आम्ही भिक मागत नाही काय करायचे ते सांगा.
मोदी साहेब शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही
मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहिजेत. तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही शेतकरी काय करेल फायनन्सवाले दम देतात, पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची. शेतकरी सारखा जुगार कोण खेळत नाही आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे ते तुमच्या नकारतेमुळे आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, असे लिहीले असून शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब असे लिहीले आहे.