भागलपूर-लॉकडाऊनच्या काळात अनेक हालअपेष्टा सोसणाऱ्या स्थलांतरित मजुरांवर काळाने घाला घालण्याच्या दुर्दैवी घटना चालूच आहेत. अशाच एका घटनेत मंगळवारी बिहारमध्ये झालेल्या अपघातात 9 स्थलांतरित मजूर मृत्युमुखी पडले.
बिहारमधील काही मजूर उपजीविकेसाठी पश्चिम बंगालला गेले होते. घरवापसीसाठी ते सहा दिवसांपूर्वी कोलकत्यातून सायकलवरून निघाले. काही प्रवास केल्यानंतर त्यांना बिहारकडे निघालेला ट्रक आढळला. त्या ट्रकमधून त्यांनी घराची वाट धरली. मात्र, बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सकाळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. समोरून येणाऱ्या बसची धडक टाळण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. त्या अपघातात 9 मजूर जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनरने पलायन केले.
दरम्यान, अपघातातील जीवितहानीबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली. बिहारमधील अपघातामुळे स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यांत पोहचण्यासाठी जीवावर उदार होऊन धोकादायक प्रवास करत असल्याची आणखी एक घटना समोर आली.