नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमध्ये लष्कराच्या छावणीची भिंत कोसळून ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली आहे. भिंत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीच्या सीमेवरची ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बांधकाम मजूर असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर ३ वाजता लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. लखनौच्या दिलकुशा भागात ही लष्करी छावणी आहे. काही बांधकाम मजूर छावणीच्या भिंतीला लागून झोपड्यांमध्ये राहात होते.
UP | Nine people dead and 2 injured after a wall collapsed due to heavy rain in Lucknow. The incident took place in Dilkusha under Cantt: Home Department pic.twitter.com/Kxmml42KBe
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 16, 2022
पावसामुळे ही भिंत थेट या झोपड्यांवरच कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाली. जवानांनी ९ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, लखनौमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पार्श्वभूमीवर लखनौमधील शाळांमधल्या बारावीपर्यंतच्या वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.