महाड: कोकणात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केल्याचे दिसत आहे. कारण मागील काही दिवसापासून इथे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे,
या दुर्घटनेत आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत, त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला.
महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच, बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे.
माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले असल्याची माहिती देण्यात आली आहे.