नवी दिल्ली : देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दरम्यान, एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जगात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारताने इटलीला मागे टाकले असून भारत आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना करोनाची लागण झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे. भारतात करोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात करोनामुळे शुक्रवारी सर्वाधिक १३९ मृत्यू झाले. दिल्लीमध्ये ५८, गुजरातमध्ये ३५, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ आणि बंगालमध्ये ११ मृत्यू झाले. राज्यात शुक्रवारी करोनाच्या २४३६ नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात एकूण ८०,२२९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे.
राज्यात शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. आज १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २८४९ जणांचे बळी गेले आहेत. सध्या राज्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे.