नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीतिमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेला १६ जणांचा एक गट खंमीगर ग्लेशियरजवळ अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंडीमुळे येथे अडकलेल्या ट्रेकर्सपैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तर अडकलेल्या इतर ट्रेकर्सला सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. यासाठी लाहौल स्पीति जिल्हा प्रशासनाने ३२ सदस्यांचा एक बचाव गट स्थापन केला आहे.
लाहौल स्पीतिचे जिल्हाधिकारी नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंमीगर ग्लेशियरजवळ अडकलेल्या १६ ट्रेकर्सची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदतकार्य सुरु केलं आहे. स्पीति प्रशासनाने समोवारी सकाळी १६ सदस्यांच्या गटातील दोन सदस्यांनी काजा येथे येऊन आपल्या गटातील अन्य सदस्य ग्लेशियरजवळ अडकल्याची माहिती दिली. यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याचंही या सदस्यांनी सांगितले .
१४ सदस्य त्या ठिकाणी अडकले आहे. प्रशासनाने ३२ जणांची एक टीम तयार केली असून यामध्ये इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसांच्या १६ जवानांचा समावेश आहे. तसेच डोगरा स्काउटचे ६ आणि एका डॉक्टरचाही समावेश आहे. त्याचबरोबर १० जण सामान वाहून आणण्याचं काम करण्यासाठी या टीममध्ये घेण्यात आले.
कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगलामधील इंडियन माउंटेनियरिंग फांउडेशनच्या सहा सदस्यांची तुकडी बातलवरुन काजाला येणार होते. हे सर्व गिर्यारोहक खमींगर हिमनदी (ग्लेशियर) मार्गाने येणार होता. या सहा जणांसोबत १० सामान उचलणारेही आहेत. प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, तीन ट्रेकर, एक शेरपा आणि १० सामान वाहून नेणारे या मार्गाने गेले. या ग्लेशियरची उंची जवळजवळ ५ हजार ३४ मीटर इतकी आहे. हे सर्वजण या ग्लेशियरजवळ अडकले आहेत.
बचाव तुकडीला या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य करण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र हा फारच दुर्गम भाग असल्याने येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने पोहचता येणं शक्य नाही. त्यामुळेच ३२ जणांच्या गटाची स्थापना करण्यात आलीय.
मदतकार्य पिनच्या खोऱ्यामधील काह गावापासून सुरु केलं जाणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी काहपासून चंकथांगो, दुसऱ्या दिवशी चंकथांगोपासून धारथांगो आणि शेवटच्या दिवशी धारथांगोपासून खमींगर ग्लेशियरपर्यंतचा पल्ला पार करत ही टीम अडकलेल्या गिर्यारोहकांपर्यंत पोहचले. त्यानंतर पुढील तीन दिवस पुन्हा काह येथे येण्यासाठी लागतील असं सांगितलं जात आहे.
कोलकाता येथील आनंदपूर बैरकपूरमध्ये राहणारे भास्कर देव मुखोपाध्याय या ६१ वर्षीय गिर्यारोहकाबरोबरच ३८ वर्षीय संदीप कुमार ठाकुराता यांचा मृत्यू झाला आहे. तर ५८ वर्षीय देबाशीष बर्धन, ६३ वर्षीय रणधीर राय, ५० वर्षीय तपस कुमार दास, चित्तरंजन बर्धमान आणि ४२ वर्षीय अतुल अशी या ठिकाणी अडकलेल्या गिर्यारोहकांची नाव आहेत.