वाघोली – कमी-उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाल्याचे प्रकार वाघोली-आव्हाळवाडी रोड वरील उत्सव रेसिडेन्सी सोसायटीमध्ये पहावयास मिळत आहे. याबाबतीत सोसायटी धारकांनी महावितरण, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मुख्यमंत्र्यापर्यंत ई-मेल द्वारे तक्रारी केल्या आहेत. घरगुती उपकरणांचे होणारे नुकसान व तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने सोसायटी धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उत्सव रेसिडेन्सी सोसायटीमध्ये कधी कमी तर कधी अचानक उच्च दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे पाण्याची मोटार, लिफ्ट आदी उपकरणे जनरेटरवर चालवावी लागतात. त्यामुळे खर्चाचा भुर्दंड वाढतो. विजेच्या या प्रकारामुळे रहिवासी वैतागले आहे. विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे जवळपास दीड लाख रुपयांची टीव्ही, फ्रीज, फॅन, मिक्सर आदी उपकरणे जळाली असल्याचे सोसायटी धारकांनी सांगितले.
सातत्याने जाणवणाऱ्या समस्येमुळे त्रस्त सोसायटी धारकांनी महावितरण पासून आमदार, खासदार, ते थेट मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तक्रार केली आहे. त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन देखील तक्रारी केल्या आहेत. विजेच्या समस्यांमुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. इथे राहणे मुश्किल झाले आहे. विजेची ही समस्या सोडविण्यासाठी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सोसायटी धारक करीत आहे.
सोसायटीला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल ला अनेक जोड आहेत. तसेच अन्य काही समस्या व पावसाळा असल्याने बिघाड होत असेल. त्यांच्या समस्यांची दखल घेतो असे वाघोलीचे महावितरणचे शाखा अभियंता गणेश श्रीखंडे यांनी सांगितले.
“वाघोलीतील उत्सव रेसिडेन्सी सोसायटीत कमी-उच्च दाबाने वीज पुरवठ्यामुळे तेथील अनेक रहिवाशी यांचे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब झाले आहेत त्यांची समस्या सोडविण्यासाठी महावितरणचे अधिकारी, बिल्डर व रहिवाशी यांची एकत्रित बैठक घेऊन समस्या मार्गी लावणार आहे.” – संदीप सातव (संघटन सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा)