अनिल विद्याधर
लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारी, वेतनकपात, इंधनदरवाढ, महागाई अशा संकटमालिकांचा सामना करत असताना आता वीजबिलाने “शॉक’ दिला आहे. राज्यातील अनेक वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली. एप्रिल महिन्यात अवास्तव वाढवलेले वीजदर आणि अतिरिक्त वीजवापर या दोन्हींचा विचार केला तरी अनेक बिलांचे समर्थन करता येणार नाही!
आपत्तीच्या काळात लोकनियुक्त सरकारांनी जनतेला अधिकाधिक दिलासा कसा देता येईल यासाठीच्या उपाययोजना करणे अभिप्रेत असते.आपत्कालीन परिस्थितीत जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्यास, त्यांच्या संकटांमध्ये भर घालणारे निर्णय वा कृती केल्यास जनसामान्यांतून संतापाचा सूर ऐकायला मिळतो.
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्यांना आर्थिक फटके बसत आहेत. नोकऱ्यांवर गदा येऊ लागल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. “उद्याची भ्रांत’ असणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वेतनकपात केली जात आहे.
अशा संकटांचा सामना करताना मेटाकुटीला आलेल्या नागरिकांच्या खिशाला पेट्रोल-डिझेलच्या भरमसाठ दरवाढीने नवी कात्री लागली आहे. होते नव्हते तेवढे सगळे पैसे लॉकडाऊनच्या अडीच-तीन महिन्यांच्या काळात संपून गेलेले असताना आता नागरिकांच्या हाती अव्वाच्या सव्वा किमतीची वीजबिले येऊन पडली आहेत. या बिलांचे आकडे पाहून अनेकांची झोप उडाली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांचे मीटर रिडिंग घेतले गेले नाही. वीज बिलेही दिली गेली नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांना एकदम तीन महिन्यांचे वीजबिल दिले गेले आहे. यासाठी सरासरी बिल आकारणीचा फॉर्म्युला वापरण्यात आल्याचे सांगितले गेले असले तरी अनेकांची वीजबिले ही मागील वर्षाच्या 12 महिन्यांच्या वीजबिलांपेक्षा अधिक आहेत.
सर्वसामान्यांचे सोडाच, बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या घराचे एका महिन्याचे बिल 36 हजार रुपये आले आहे. आपल्या घरात कोणतेही नवे उपकरण, मशीन अथवा इलक्ट्रिकल वस्तू खरेदी केलेली नाही किंवा अधिक वीज वापरलेली नाही, असे असताना 36 हजार रुपये इतके लाइटबिल पाहून तिने या “शॉक’विषयी उद्वेग व्यक्त केला आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनाही असाच अनुभव आला. त्यांना 8 मे रोजी 5 हजार 510 रुपये वीजबिल आले. तर जूनमध्ये 29 हजार 700 रुपये इतके बिल आले आहे. या बिलामध्ये मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांच्या बिलांचा उल्लेख केला असला तरी मे महिन्याचे बिल 18 हजार 080 इतके नोंदवण्यात आले आहे. याविषयी त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक आहेत.
राज्यात अशा प्रकारे हजारो जणांना अतर्क्य वाटणारी बिले देऊन वीज वितरण कंपनीने आपल्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन घडवले आहे. मार्च ते मे हा उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे घरांमध्ये फ्रीज, पंखे, एसी आदींचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने दरवर्षी या काळात विजेचा वापर वाढतो आणि लाइटबिल तुलनेने अधिक येते, ही गोष्ट सर्वसामान्यांना पक्की माहीत आहे.
वर्षानुवर्षे ही बिले न तक्रार करता सामान्य नागरिक अदाही करत आले आहेत. एक हजार रुपये बिल येणाऱ्या वीजग्राहकाला सामान्यतः या काळात दीड हजार रुपयांपर्यंत बिल येते. पण तेच बिल जर 3 हजार रुपये आले आहे. राज्यात अनेकांच्या हाती अशा प्रकारची बिले आली असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांना या वाढीव वीजबिलांविषयी म्हणतात, राज्यातील अंदाजे 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे.
प्रत्यक्षात या बिलांतील वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण नैसर्गिक आहे. मार्च ते जून पूर्णपणे उन्हाळा कालावधी आणि लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्वजण घरात. त्यामुळे सर्व खोल्यांमधील दिवे, पंखे, टीव्ही, कॉम्प्युटर सुरू. त्यामुळे वीज वापर वाढला आहे. दुसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून झालेली दरवाढ. 1 एप्रिल नंतर हे पहिलेच बिल आहे आणि आता आलेल्या बिलांतील अडीच महिने हे जादा वीज दराचे आहेत.
ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण दरवाढ माहितीच नसल्याने बिले चुकीची आली आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे.
घरगुती वीज ग्राहकांचे 1 एप्रिलच्या आधीचे दर व 1 एप्रिलपासून वाढलेले सध्याचे दर यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. वीज बिलांतील स्थिर आकार पूर्वी दरमहा 90 रुपये होता, तो आता 100 रुपये झालेला आहे. वहन आकार पूर्वी 1.28 रुपये प्रति युनिट होता, तो आता 1.45 रुपये प्रति युनिट झाला आहे. वीज आकार पहिल्या 100 युनिट्ससाठी पूर्वी 3.05 रुपये प्रति युनिट होता, तो आता 3.46 रुपये प्रति युनिट झालेला आहे.
100 युनिट्स पुढील 101 ते 300 युनिट्स पर्यंतचा दर पूर्वी 6.95 रुपये प्रति युनिट होता, तो आता 7.43 रुपये प्रति युनिट झालेला आहे. 300 युनिट्सच्या पुढील 301 ते 500 युनिट्स पर्यंतचा दर पूर्वी 9.90 रुपये प्रति युनिट होता, तो आता 10.32 रुपये प्रति युनिट झालेला आहे.
स्थिर आकार, वहन आकार व वीज आकार ही एकूण वाढ 100 युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी 16 टक्के आहे व 100 युनिट्सच्या वरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी दरवाढ 13 टक्के आहे. आणि या वाढीव वीज दराने ग्राहकांना प्रथमच बिले आलेली आहेत.
मुळात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालेला असतानाही महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर केला. 1 एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होतील असे जाहीर केले. हा निर्णय उशिरा केला असता अथवा लॉकडाऊन म्हणून तात्पुरता स्थगित ठेवला असता तर काही आभाळ कोसळले नसते. एवढेच नाही तर दरवाढ स्पष्ट दिसत असतानाही चुकीच्या पायावर वीजदर कमी केले अशी जाहिरातबाजीही केली.
फेब्रुवारी 2020 चा दाखविलेला पण चुकीचा अवाढव्य इंधन समायोजन आकार 1.05 रुपये प्रति युनिट मूळ सरासरी देयक दरात समाविष्ट केला. त्यामुळे 2019-20 चा सरासरी देयक दर 6.85 रुपये प्रति युनिट ऐवजी 7.90 रुपये प्रति युनिट गृहीत धरला व हा देयक दर 7.90 रुपये वरून 7.31 रुपये प्रति युनिट वर आणला म्हणजे दरकपात केली असे दाखविले गेले.
प्रत्यक्षात सरासरी देयक दर 6.85 रुपये प्रति युनिट वरून 7.31 रुपये प्रति युनिट याप्रमाणे वाढविण्यात आला आहे. ही दरवाढ 0.46 रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी 6.7 टक्के होते. महावितरण कंपनीनेही त्या काळात सोयीस्कर मौन धारण केले. आता ऊर्जामंत्री यांनी बिलांतील वाढीची माहिती देताना 1 एप्रिलपासून दरवाढ झाल्याचे मान्य केले आहे. या दरवाढीला नागरिकांनी एकजुटीने विरोध करायला हवा.