एखाद्या लॉंग विकेंडची चाहूल लागताच काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवावेत असा विचार मनाला चाटून गेला नाही तर नवलंच! अगदी दोन दिवसांची जोडून सुट्टी आली तरी लोणावळा, सिंहगड, कोकण, महाबळेश्वर यांसारख्या निसर्गरम्य स्थळांवर कॉंक्रीटच्या जंगलात वावरणाऱ्या महानगरवासियांची रीघ लागते. एरवी तारेवरची कसरत करत स्ट्रेसफुल लाईफ जगणाऱ्यांना निसर्गाच्या कुशीतले ते दोन क्षणही सुखावून जातात. धकाधकीच्या जीवनामुळे शरीरावर आणि मनावर साठलेली मळभ निसर्गाच्या सानिध्यानं एका क्षणात दूर होते आणि येणाऱ्या अनेक दिवसांसाठी ऊर्जा देऊन जाते. जर ही निसर्गाची अद्भूत शक्ती तुम्हाला रोज अनुभवायला मिळाली तर? नुसती कल्पना केली तरी भारी वाटतं ना? तर मग आज आपण अशा व्यक्तीस भेटणार आहोत ज्यांनी ही कल्पना सत्यात उतरवली.
आरएमडी फाउंडेशन व माणिकचंद इंडस्ट्रीच्या डायरेक्टर पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत असतानाच शोभाताई धारिवाल यांनी आपल्या परसात वाढवलेली आणि जोपासलेली बाग खरंच कौतुकास पात्र आहे! आता परसात वाढवलेली बाग निसर्गाची अनुभूती देऊ शकते काय? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल मात्र शोभाताई धारिवाल यांची बाग तब्बल पावणेदोन एकरात पसरली असल्याने येथे अगदी वटवृक्षांपासून ते वेलींपर्यंत अशा हजारो प्रकारच्या वनस्पती आढळतात.
आपल्या बागेतील वनस्पतींना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या शोभाताई पहाटेपासून बागेत काम करतात. झाडांना पाणी देण्यापासून ते अगदीच पानांची छाटणी, कलम करण्यापर्यंत अशा सर्व कामांमध्ये त्या पारंगत आहेत. बागेच्या सुशोभीकरणाकडे शोभाताईंचा विशेष कटाक्ष असतो. शोभाताईंच्या या कौशल्यांमुळेच त्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी उद्यानात आयोजित करण्यात येणाऱ्या वनस्पती सुशोभीकरण स्पर्धेमध्ये बऱ्याचदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
शोभाताईंच्या बागेत केवळ वनस्पतीच नव्हे तर विविध प्रकारच्या पक्षांची देखील रेलचेल असते. दिवसातल्या कोणत्याही वेळी बागेत गेल्यास पक्षांच्या किलबिलीचे मंजुळ स्वर कानावर पडून मन प्रसन्न होते. दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात पक्षांची किलबिल, रंगबेरंगी फुलझाडे, मनमोहक वेली असं रम्य चित्र पाहायला मिळणं दुर्मिळच! मात्र, शोभाताईंनी फुलवलेल्या बागेमुळं पुण्यासारख्या महानगरामध्ये या निसर्गाची अनुभूती आता शक्य आहे.