लाहोर– विराट कोहली सध्या प्रचंड बॅडपॅचमधून जात असला तरीही तो महान फलंदाज आहे. लवकरच त्याला सुर गवसेल व तो पुन्हा एकदा यशस्वी ठरेल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केला असून त्याने कोहलीवर टीका करत असलेल्यांना फटकारले आहे.
प्रत्येक खेळाडूला अशा अपयशी कालखंडाचा सामना करावा लागला होता. सचिन तेंडुलकरही याला अपवाद नव्हता. त्यामुळे कोहलीला सातत्याने टीकेचे लक्ष्य करणे योग्य नाही, त्यालाही सुर गवसेल फक्त काही काळ प्रतिक्षा करावी लागेल, असेही अख्तर म्हणाला.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरु संघाचा प्रमुख फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहलीची अपयशी कामगिरी अद्याप कायम राहिली आहे. त्याने या स्पर्धेत एका अर्धशतकासह 216 धावा केल्या असल्या तरीही त्याच्या दर्जानुसार त्याच्याकडून कामगिरी झालेली नाही. त्यातच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात कोहली षटकातील पहिल्याच चेंडूवर खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला व त्याच्या नावावर गोल्डन डकची नामुष्की नोंदली गेली.