पुणे -राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागात नवीन 20 ई-बस (शिवाई) दाखल होणार आहे. पुणे विभागातून अहमदनगर नंतर आता औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि मुंबई या मार्गांवर वातानूकुलीत ई-बस धावणार आहेत.
एसटी महामंडळाने 1 जून 2022 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. याच दिवशी एसटीच्या ताफ्यात पहिली ई-बस दाखल झाली होती. पुणे ते नगर या एकाच मार्गावर सध्या “शिवाई’ बस धावत आहे. ही बस वातानूकुलित आणि आरामदायी असल्यामुळे तिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाने पुढील तीन वर्षांत आणखी पाच हजार ई-बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बस टप्याटप्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 ई-बस दाखल होणार आहेत.
या सर्व बस पुणे विभागाला मिळणार आहेत. यातील 20 बस फेब्रुवारी अखेर ताफ्यात दाखल होणार आहे. या ई-बस औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि कोल्हापूर या मार्गांवर धावतील. यासाठी पुणे विभागात चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्यात असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. राज्यात पुणे हा एकमेव विभाग असणार आहे, जेथून एसटीच्या सर्वाधिक ई-बस धावणार आहे.