नगर – सरकारी मदतीशिवाय शहरातील सामान्य नागरीकांसाठी अवघ्या दहा रुपयांत भोजनथाळी देण्याचा प्रस्ताव शिववरद प्रतिष्ठानने दिला आहे. प्रतिष्ठानचे मार्गदर्शन किशोर डागवाले यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, महापालिका आयुक्तांकडे उपलब्ध जागेची मागणी केली आहे.
प्रतिष्ठानाचे अध्यक्ष नितीन डागवाले यांच्या सहीने हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये शिववरद प्रतिष्ठान दररोज नगरमधील साधारण 700 नागरीकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहे.
त्यातही गर्दी टाळण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते घरोघर जाऊन भोजन वाटप करत आहेत. विशेष म्हणजे याच काळात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे रंगारगल्लीत मोफत दवाखानाही सुरु करण्यात आला. तेथेही नागरीकांची मोफत तपासणी करुन त्यांना औषधोपचार करण्याचे काम शिववरद प्रतिष्ठान सध्या करत आहे.
दरम्यान, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अजून किती दिवस लॉकडाऊन असेल, याचा अजून कुणालाही अंदाज नाही. तसेच लॉकडाऊन उघडल्यानंतरही लगेच रोजगार मिळतील, अशी स्थितीही सध्या दिसत नाही. त्यामुळे भविष्यात सामान्य माणसाच्या भूकेचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी यापुढी काळातही अवघ्या दहा रुपयांत शिवभोजन थाळीसारखी जेवणाची व्यवस्था करण्याची आमच्या प्रतिष्ठानाची तयारी असल्याची भूमिका डागवाले यांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली.
या उपक्रमात कोणत्याही सरकारी मदतीची गरज नसल्याची भूमिका मांडताना केवळ हा उपक्रम सुरु करण्यासाठी याच भागात महापालिकेलच्या बंद पडलेल्या शाळेतील काही जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी भूमिका डागवाले यांनी मांडली आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांनी यासाठी सकारत्मक प्रतिसाद दिला असून, तेथे व्यवस्था करण्यासंदर्भात डागवाले यांना आश्वासित केले आहे. डागवाले यांच्या या उपक्रमाने सामान्य माणसांना अत्यल्प दरात भरपेट जेवण मिळेल, अशी अपेक्षा आहे.
नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांनी घेतली उपक्रमाची दखल
सामान्य नागरीकांना अत्यल्प दरात कायमस्वरुपी भोजन देण्याची तयारी दर्शविल्याने किशोर डागवाले यांच्या नियोजित उपक्रमाची नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही दखल घेतली. डागवाले यांनीच भोजनथाळीची सविस्तर कल्पना मंत्री तनपुरे यांच्या कानावर घातली. त्यानंतर तनपुरे यांनी तत्काळ महापालिका आयुक्त श्रीकांत मायकेलवर यांच्याशी चर्चा करुन या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या.
करोनामुळे देशातील सर्वच उद्योगधंद्यांना घरघर लागली आहे. अशास्थितीत उद्योग-व्यवसाय पुन्हा कधी उभे राहतील, याचा अजून काहीच अंदाज नाही. लॉकडाऊन संपल्यानंतरही सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेलच, याची खात्री नाही. त्यात लॉकडाऊन संपल्यानंतर सामाजिक संस्था, संघटनांकडून दिली मदत बंद होईल. त्यामुळे पुन्हा सामान्य माणसांचे हाल होतील. सरकारी शिवभोजन थाळीला मर्यादा आहेत. ती सर्वांनाच उपलब्ध होत नाही. अशावेळी अत्यल्प दरात शिववरद प्रतिष्ठान नगरकरांना भोजन उपलब्ध करुन देऊ इच्छिते. त्यासाठी कोणत्याही सरकारी मदतीची देखील गरज नाही. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या सामाजिक कामात योगदान द्यायला तयार आहेत.
किशोर डागवाले
संस्थापक, शिववरद प्रतिष्ठान, नगर.