प्रवासी घटले : फक्त 52 टक्के भारमान
पुणे – गाजावाजासह सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसेस एसटी महामंडळाला पोसणे डोईजड ठरत आहेत. सततचे अपघात, ब्रेकडाऊनमुळे प्रवाशांनी या बस सेवेकडे पाठ फिरवली आहे. सध्या राज्यात शिवशाहीच्या 1 हजार 30 बसेस धावत असून यासाठी प्रवासी भारमान 52 टक्क्यांपर्यंत घटले आहे.
वातानुकूलित बस म्हणून 2016 मध्ये शिवशाही आसन बससेवा तर, सन 2018 मध्ये शयनयान (स्लीपर कोच) बससेवा सुरू केली. परंतु, बसेसच्या अनिश्चित व असुरक्षित वाहतुकीमुळे प्रवाशांची मागणी घटली आहे. तसेच, मागील सहा महिन्यांपासून दहा मार्गांवरील शयनयान सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता भिस्त आसनी बसेसवर आहे.
लालपरी लोकप्रियच
राज्याच्या ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पोचलेली एस.टी. बस म्हणजे लालपरी (साधी बस) आहे. या बसला ग्रामीण भागात मोठी मागणी असून सध्या लालपरीचे राज्यभरात सर्वाधिक 72 टक्के प्रवासी भारमान आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित आरामदायी बसेस दाखल होऊनही लालपरीची लोकप्रियता टिकून आहे.
“यशवंती’ बसेसचे नीचांकी भारमान
शिवशाहीसह शिवनेरी आणि यशवंती (मिडी बस) सेवादेखील तोट्यात सुरू आहे. राज्यभरात शिवनेरीच्या 123 बसेस धावत असून त्याचे प्रवासी भारमान 50तर, यशवंतीच्या 245 बसेस धावत असून त्याचे भारमान 14 टक्के इतके नीचांकी आहे. दरम्यान, शिवशाहीऐवजी त्या मार्गांवर लालपरी सोडून महामंडळाने तोटा भरून काढावा, अशी मागणी समोर येत आहे.
सुरक्षा साधने गायब
शिवशाही बसेसच्या ब्रेकडाउनचे प्रमाणही वाढले आहे. अनेक बसेसमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव आहे. यामुळे बसच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लालपरी आणि हिरकणी बसेस कमी करून महामंडळ प्रशासन शिवशाही आणि इतर बसेस प्रवाशांच्या माथी मारत आहे. मात्र, या बसेसची दुरवस्था झाली आहे. अनेक शिवशाही बसेसमध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही, प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक सिलिंडर नसल्याचे दिसून येते. यामुळे अपघात झाल्यास तत्काळ उपचार मिळत नाही. अनेक बसमध्ये सीसीटीव्ही नसल्याने गुन्हे वाढले आहेत. मागील काही दिवसांत शिवशाहीच्या इंजिनमधून धूर येणे, टायर फुटणे, आग लागणे असे प्रकार वाढले आहेत. यामुळे शिवशाहीच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.